प्लास्टिक एक वाढती समस्या
आपण ज्या वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, त्याच वेगाने आपण पर्यावरणाच्या हानीकडे देखील वाटचाल करत आहोत. आज शहरांमध्ये पाय ठेवला की जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात दिसते, ती म्हणजे प्लास्टिक. रस्त्यांवर, दुकानांमध्ये, कचराकुंड्यांत, वाहत्या नाल्यांमध्ये सर्वत्र प्लास्टिकचं साम्राज्य पसरलेलं दिसतं.
प्रत्येक किरकोळ खरेदीसोबत येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, फूड पॅकिंग मटेरियल, चमचे, स्ट्रॉ, कटलरी यांचा वापर इतक्या सहजतेने केला जातो की त्याची सवय आपल्या रोजच्या जगण्यात खोलवर रुजली आहे. हीच सवय आज शहरासाठी एक मोठं संकट बनली आहे.
प्लास्टिकचा मुख्य धोका म्हणजे तो सहजपणे नाश पावणारा पदार्थ नाही. एकदा प्लास्टिक तयार झालं की ते शेकडो वर्षे नष्ट न होता पर्यावरणात राहू शकतं. त्यामुळे शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या टनोगणिक प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.
पावसाळ्यात शहरांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवते, नाले तुंबतात, रस्ते जलमय होतात यामागे बहुतांश कारण प्लास्टिक आहे. वापरून फेकून दिलेले प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतो आणि संपूर्ण शहराचे पाणी व्यवस्थापन कोलमडून पडते.आरोग्याच्या दृष्टीनेही प्लास्टिक हा एक मोठा धोका आहे. प्लास्टिक जाळल्यावर त्यातून निघणारे धुर आणि रसायने हे फुफ्फुसांचे, त्वचेचे आणि इतर अनेक आजारांचे कारण ठरतात. एवढंच नाही तर प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडतात. समुद्रात गेलेलं प्लास्टिक मासे आणि अन्य सागरी प्राणी खातात, ज्याचा शेवटी मानवाच्या अन्नसाखळीत शिरकाव होतो.
सरकारने अनेक वेळा प्लास्टिकवर बंदी घातली आहे, पण प्रत्यक्षात ही बंदी शहरांमध्ये फारशी यशस्वी ठरत नाही. कारण आपल्याला त्याचे गंभीर परिणाम जाणवत नाहीत. ग्राहक प्लास्टिक घेतात, विक्रेते देतात, प्रशासन दुर्लक्ष करतं आणि या साखळीत आपलं शहर हळूहळू प्लास्टिकच्या दलदलीत अडकतं.
या समस्येचा उपाय कोणत्या एका यंत्रणेकडून अपेक्षित नाही. त्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बाजारात जाताना कापडी पिशवी वापरणे, सिंगल यूज प्लास्टिक टाळणे, आपल्या परिसरात प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करणे ही लहान वाटणारी पण फार मोठा परिणाम करणारी पावलं आहेत.
शहरांनी पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन द्यायला हवे उदा. जैविक कचरा व्यवस्थापन, रिसायकलिंग प्लांट्स, प्लास्टिक संकलन केंद्र, आणि शालेय स्तरावरूनच पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण करणे. स्थानिक उद्योगांना मदत करणं हाही एक सकारात्मक उपाय होऊ शकतो.
शेवटी, शहरातील वाढती प्लास्टिक समस्या ही नुसती स्वच्छतेची नाही, ती आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जर आपण सजग नाही राहिलो, तर उद्या आपली शहरं प्लास्टिकच्या डोंगराखाली गुदमरून जातील. म्हणूनच आजच, आत्ता, या क्षणीच आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे "मी प्लास्टिक नको म्हणतो!"आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ, हरित आणि सुरक्षित शहर देण्याची हीच वेळ आहे. नाहीतर विकासाच्या नावाखाली आपण आपले पर्यावरण गमावून बसू........

