प्लास्टिक एक वाढती समस्या

 प्लास्टिक एक वाढती समस्या



आपण ज्या वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, त्याच वेगाने आपण पर्यावरणाच्या हानीकडे देखील वाटचाल करत आहोत. आज शहरांमध्ये पाय ठेवला की जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात दिसते, ती म्हणजे प्लास्टिक. रस्त्यांवर, दुकानांमध्ये, कचराकुंड्यांत, वाहत्या नाल्यांमध्ये  सर्वत्र प्लास्टिकचं साम्राज्य पसरलेलं दिसतं.


प्रत्येक किरकोळ खरेदीसोबत येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, फूड पॅकिंग मटेरियल, चमचे, स्ट्रॉ, कटलरी यांचा वापर इतक्या सहजतेने केला जातो की त्याची सवय आपल्या रोजच्या जगण्यात खोलवर रुजली आहे. हीच सवय आज शहरासाठी एक मोठं संकट बनली आहे.


प्लास्टिकचा मुख्य धोका म्हणजे तो सहजपणे नाश पावणारा पदार्थ नाही. एकदा प्लास्टिक तयार झालं की ते शेकडो वर्षे नष्ट न होता पर्यावरणात राहू शकतं. त्यामुळे शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या टनोगणिक प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे.

     पावसाळ्यात शहरांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवते, नाले तुंबतात, रस्ते जलमय होतात  यामागे बहुतांश कारण प्लास्टिक आहे. वापरून फेकून दिलेले प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतो आणि संपूर्ण शहराचे पाणी व्यवस्थापन कोलमडून पडते.आरोग्याच्या दृष्टीनेही प्लास्टिक हा एक मोठा धोका आहे. प्लास्टिक जाळल्यावर त्यातून निघणारे धुर आणि रसायने हे फुफ्फुसांचे, त्वचेचे आणि इतर अनेक आजारांचे कारण ठरतात. एवढंच नाही तर प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडतात. समुद्रात गेलेलं प्लास्टिक मासे आणि अन्य सागरी प्राणी खातात, ज्याचा शेवटी मानवाच्या अन्नसाखळीत शिरकाव होतो.


सरकारने अनेक वेळा प्लास्टिकवर बंदी घातली आहे, पण प्रत्यक्षात ही बंदी शहरांमध्ये फारशी यशस्वी ठरत नाही. कारण आपल्याला त्याचे गंभीर परिणाम जाणवत नाहीत. ग्राहक प्लास्टिक घेतात, विक्रेते देतात, प्रशासन दुर्लक्ष करतं  आणि या साखळीत आपलं शहर हळूहळू प्लास्टिकच्या दलदलीत अडकतं.


या समस्येचा उपाय कोणत्या एका यंत्रणेकडून अपेक्षित नाही. त्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बाजारात जाताना कापडी पिशवी वापरणे, सिंगल यूज प्लास्टिक टाळणे, आपल्या परिसरात प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करणे ही लहान वाटणारी पण फार मोठा परिणाम करणारी पावलं आहेत.


शहरांनी पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन द्यायला हवे  उदा. जैविक कचरा व्यवस्थापन, रिसायकलिंग प्लांट्स, प्लास्टिक संकलन केंद्र, आणि शालेय स्तरावरूनच पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण करणे. स्थानिक उद्योगांना मदत करणं  हाही एक सकारात्मक उपाय होऊ शकतो.


शेवटी, शहरातील वाढती प्लास्टिक समस्या ही नुसती स्वच्छतेची नाही, ती आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जर आपण सजग नाही राहिलो, तर उद्या आपली शहरं प्लास्टिकच्या डोंगराखाली गुदमरून जातील. म्हणूनच आजच, आत्ता, या क्षणीच आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे  "मी प्लास्टिक नको म्हणतो!"आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ, हरित आणि सुरक्षित शहर देण्याची हीच वेळ आहे. नाहीतर विकासाच्या नावाखाली आपण आपले पर्यावरण गमावून बसू........

मैत्री दिन एका निस्वार्थ नात्याचा सुंदर उत्सव

 मैत्री दिन 

एका निस्वार्थ नात्याचा सुंदर उत्सव



    आपल्या आयुष्यात नाती अनेक येतात… काही रक्ताच्या नात्यांनी जोडलेली, तर काही सामाजिक बंधनांनी. पण एक नातं असं असतं जे न सांगता जोडतं, न बोलता समजतं आणि न बंधनात असूनही कायम सोबत राहतं ते म्हणजे मैत्री.

   मैत्री ही नात्यांचा  आरंभ आहे. ती वय, धर्म, जात, सामाजिक स्थिती यांच्या पलीकडची असते. लहानपणीची ती गोड बालमैत्री, शाळेच्या बाकांवरून सुरू झालेली निरागस सोबत, कॉलेजमधली ती धमाल, आणि नोकरी धंद्यातली खरीखुरी साथ  प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर मैत्रीचं रूप बदलतं, पण तिचं सार कधीच बदलत नाही.


   आजचा 'मैत्रीदिन' म्हणजे फक्त फ्रेंडशिप बॅंड, मेसेजेस, फोटो टाकण्याचा दिवस नाही. तो एक निमित्त आहे . त्या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचं, त्या सगळ्या क्षणांना पुन्हा जगण्याचं.

कधी कधी आपण इतकं धावपळीचं जीवन जगतो की, एखाद्या मित्राचा फोन उचलणंही राहून जातं. पण त्याच क्षणी जर तोच मित्र संकटात सापडला तर सगळं टाकून धावून जायचं बळ फक्त मैत्रीतच असतं.

मैत्री म्हणजे केवळ एकत्र फोटो काढणं, ट्रिप्सवर जाणं, किंवा गप्पा मारणं नाही. मैत्री म्हणजे न बोलताही मनं समजणं. अडचणीत कुणी समोर नसलं तरी "मी आहे ना" म्हणणारा आवाज. कधी सल्ला देणारा, तर कधी फक्त निःशब्दपणे सोबत देणारा हात. कधी डोळ्यातले अश्रू समजणारा, तर कधी हास्याचं कारण होणारा मित्र.

   जगातल्या कुठल्याही गोष्टीत इतकं निरपेक्ष प्रेम, इतकी समजूत, इतकी सहवासाची ऊब सापडत नाही  जितकी ती एका मैत्रीत सापडते. आणि म्हणूनच, मैत्रीदिन एक सण आहे. हा दिवस केवळ 'हॅपी फ्रेंडशिप डे' म्हणून म्हणायचा नसतो, तर तो त्या सगळ्या मित्रांसाठी आभार मानण्याचा असतो, जे आपलं आयुष्य सुंदर करत असतात.

  जगाच्या गजबजाटात, डिजिटल माध्यमांच्या युगात, आपली खरी मैत्री टिकवणं कठीण झालं आहे. पण तरीसुद्धा, खऱ्या मित्रांना वेळ लागतो, काळ लागत नाही. कितीही दिवस संपर्क नसला, तरी जिथे आपण आपलं वाटतो, तीच खरी मैत्री.


आज मैत्रीदिन आहे... चला, आज आपल्या जुन्या मित्रांना एक फोन करा, एक जुनी आठवण शेअर करा, एक साधं "आठवण आली रे" एवढं सांगूनही कुणाचं मन गहिवरू शकतं.

मैत्रीचे रंग कधी फिकट होत नाहीत… आणि म्हणूनच,


"मैत्री ही अशी गोष्ट आहे 

जी जमते नाही, घडते.

ती शोधावी लागत नाही, ती घडवावी लागते…

आणि ती टिकते  मनापासून!"


मैत्रीदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जिथे मैत्री आहे, तिथेच आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आहे.

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...