इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची दैन्यावस्था
आजच्या आधुनिक आणि ग्लोबल युगात शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक मोठे बदल घडून आले आहेत. त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि चिंतेचा विषय म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे मराठी शाळांची झालेली दैन्यावस्था. एकेकाळी गावागावांमध्ये मराठी शाळा ह्या शिक्षणाचा मुख्य आधार होत्या. त्या शाळांनी अनेक कर्तबगार, अभ्यासू, सुसंस्कृत व्यक्ती घडवल्या. पण आज त्याच शाळा अस्तित्वासाठी झगडताना दिसतात.
स्वातंत्र्याच्या काळात मराठी शाळा म्हणजे शाळेचे खरे रूप होते. शिक्षकांचा आदर होता, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते आणि सर्वसामान्य कुटुंबही आपल्या मुलांना शिकवण्यासाठी झटत होते. पण जसजसे काळ बदलत गेला, तसतशी "इंग्रजी" ही भाषा प्रतिष्ठेचं, प्रगतीचं आणि यशाचं प्रतीक बनली. शहरांपासून गावांपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या आणि पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली.
पालकांच्या मनात एक गैरसमज निर्माण झाला की इंग्रजी माध्यमात शिकल्याशिवाय मुलांचं भविष्य उज्वल होणार नाही. या चुकीच्या समजुतीमुळे मराठी शाळांकडे पाठ फिरवली गेली. सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्येत मोठी घट झाली. शिक्षकांचे मनोबल कमी झाले. शिक्षक भरती थांबली किंवा बंद झाली. अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद होऊ लागल्या.
इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेणं हा अनेकांसाठी "स्टेटस सिंबॉल" झाला. परंतु, इंग्रजी भाषा येणे आणि ती शिकणे हे आवश्यक आहे, पण त्यासाठी आपल्या मातृभाषेच्या शिक्षणाची बळी देणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न निर्माण होतो. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक वेळा भाषिक समज आणि विचार स्पष्टपणे मांडण्यात अयशस्वी ठरतात, कारण त्यांची मातृभाषेशी नाळ तुटलेली असते. दुसरीकडे, मराठी शाळांमधून शिकलेली अनेक मोठी व्यक्तिमत्त्वं समाजाच्या विविध क्षेत्रात यशस्वी ठरली आहेत.
मराठी शाळांमध्ये गुणवत्ता आहे, परंतु तिचं योग्य ब्रँडिंग, सुविधा आणि संधी यांची कमतरता आहे. अनेक ठिकाणी मराठी शाळा वयोवृद्ध इमारतींत चालतात, डिजिटल सुविधा नाहीत, नवोपक्रमांची कमतरता आहे, तर दुसरीकडे इंग्रजी शाळांमध्ये AC क्लासरूम्स, स्मार्ट बोर्ड, इंग्रजी बोलणारे शिक्षक, आणि आकर्षक युनिफॉर्म यामुळे पालक आणि विद्यार्थी आकर्षित होतात.
मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि पुन्हा त्यांचा गौरव वाढवण्यासाठी सरकारसह समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, आणि पालकांमध्ये जनजागृती करणे ही पावले उचलली गेली पाहिजेत. मातृभाषेतून शिक्षण हे बालकाच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे मराठी शाळांचे महत्त्व टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, "इंग्रजी शिका जरूर, पण मराठी शाळा आणि मराठी मातीशी नाळ जोडून ठेवा." कारण आपल्या संस्कृतीचं आणि अस्मितेचं मूळ या मातृभाषेच्या शिक्षणातच आहे. मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं साधन नाही, तर ती आपली ओळख, आपली मुळे आणि आपलं संस्कारक्षम पिढी घडवणारी शाळा आहे. त्यामुळे मराठी शाळांना वाचवणं म्हणजे आपल्या संस्कृतीला वाचवणं होय.

No comments:
Post a Comment