या अधुनिक युगात जुने गुरुजी कोठे तरी हरवले

 या अधुनिक युगात जुने गुरुजी कोठे तरी हरवले...



कधीकाळी शिक्षक हा केवळ एक व्यवसाय नव्हता. तो एक जीवनधर्म होता. शाळेच्या परिसरात गुरुजींची पाऊलवाट म्हणजे शिस्तीची, आदराची आणि प्रेमाची पाऊलवाट वाटायची. त्यांच्या आवाजात करडेपणा असायचा, पण त्यामागे असायचा नितळ प्रेमाचा सूर. पांढऱ्या धोतरात, खांद्यावर अंगोछा ठेवून आलेले गुरुजी केवळ शालेय शिक्षण देत नसत, तर आयुष्य शिकवत असत.

आज हे गुरुजी कुठे दिसतात? आजच्या यंत्रयुगात, टेक्नॉलॉजीच्या स्पीडमध्ये, आणि मार्कांच्या शर्यतीत ते कुठे तरी हरवले आहेत. आजचा शिक्षक स्मार्टफोन आणि प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकवतो, पण 'संस्कार' देणारा, 'चरित्र' घडवणारा जुना गुरुजी मात्र दिसत नाही. शाळा ही शिक्षणाची फॅक्टरी झाली आहे आणि शिक्षक 'सर्व्हिस प्रोव्हायडर'. ज्ञानाचा व्याप झाला आहे, पण ज्ञानाचा अनुभव हरवला आहे.

जुने गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखायचे, त्यांच्या घरची परिस्थिती माहिती असायची. गरिबाच्या पोराला स्वतःच्या खिशातून वही घेऊन देणारे, अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला रागावणारे, पण नंतर स्वतःहून वेळ काढून शिकवणारे गुरुजी आज कुठे दिसतात?

पूर्वी गुरुजींच्या शब्दाला आई-वडिलांच्या शब्दाइतकीच किंमत असायची. पण आज समाज बदलला, शाळा बदलल्या, आणि शिक्षकही बदलले. अभ्यासाच्या पुस्तकांसोबतच आता मुलांच्या हाती मोबाईल आहेत, आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनवर गुरुजींच्या डोळ्यांतली काळजी, प्रेम, शिस्त काहीच दिसत नाही.

या सगळ्यात जुने गुरुजी हरवलेत. त्यांच्या जागी आलेले आधुनिक शिक्षक ज्ञान देतात, पण अनुभव देत नाहीत; ते मार्गदर्शन करतात, पण ‘प्रेरणा’ नाही देत. शाळेचा तो जुना सुगंध, वर्गखोल्यांतील गजर, गुरुजींचा खड्या आवाजात घेतलेला हजेरीचा तास... हे सगळं आठवणींच्या धूसर कोपऱ्यात जाऊन बसलंय.

आज गरज आहे त्या जुन्या गुरुजींच्या विचारांची. जेवढं विज्ञान पुढं गेलंय, तेवढीच संस्कृती, मूल्यं, आणि शिक्षक-विद्यार्थी नातंही मागे गेलंय. आपण पुन्हा एकदा त्या मूळ मुळाशी जावं लागेल. कारण शिक्षक म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे, तर विद्यार्थ्याच्या मनाचा शिल्पकार असतो.

जुने गुरुजी हरवलेत का? की आपणच त्यांना दुर्लक्षित केलं? या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी जरूर करावा. कदाचित ते हरवले नाहीत… आपणच त्यांचं अस्तित्व विसरलो आहोत.

✍🏻तनवीर पठाण✍🏻

No comments:

Post a Comment

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...